वृद्ध शेतकर्याचा उष्माघाताने मृत्यू

माण तालुक्यातील तेलदरा (भांडवली) येथील वृद्ध शेतकर्याचा उष्माघाताने शेतातील आंब्याच्या झाडाखालीच मृत्यू झाला.
दहिवडी : माण तालुक्यातील तेलदरा (भांडवली) येथील वृद्ध शेतकर्याचा उष्माघाताने शेतातील आंब्याच्या झाडाखालीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद दहिवडी पोलिस ठाण्यात झाली आहे. माण तालुक्यातील उष्माघाताची या वर्षीची पहिली घटना असून दिवसेंदिवस उष्णतेची दाहकता वाढू लागली आहे.
ज्योतिराम निवृत्ती शिंदे (वय 78 रा. तेलदरा) असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत दहिवडी पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 21 एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून ज्योतिराम शिंदे हे घरातून गायब झाले होते.
तीन दिवस घरातील सर्वजण त्यांचा शोध घेत होते. मुलगा योगेश त्यांचा शोध घेत असताना त्यांच्याच मोगल दुती या शिवारात आंब्याच्या झाडाखाली जोतीराम शिंदे मृत अवस्थेत आढळले. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची नोंद दहिवडी पोलिस ठाण्यात झाली असून तपास हवालदार आर. एस. गाढवे करत आहेत.