नायगाव येथील सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी 142 कोटी 60 लाख मंजुर

नायगाव (ता. खंडाळा) येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी 142 कोटी 60 लाख रुपयांच्या, तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67 लाख 17 हजारांच्या निधीस राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
सातारा : नायगाव (ता. खंडाळा) येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी 142 कोटी 60 लाख रुपयांच्या, तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67 लाख 17 हजारांच्या निधीस राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रस्तावित विकास कामांना गती मिळणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
नायगाव येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंती सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले यांंच्या स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने 10 एकर जमिनीचे तत्काळ अधिग्रहण करावे, असे निर्देश देऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानाला साजेशा भव्य स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही,अशी ग्वाही दिली होती. मंत्री जयकुमार गोरे यांनीही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थान असलेले हे गाव ग्रामविकास मंत्री म्हणून मी दत्तक घेत असल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी 142.60 कोटी तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67.17 लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी गेली कित्येक वर्षे मी प्रयत्नशील होतो. मागच्या सरकारमध्येही मी सातत्याने हा विषय लावून धरला होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नायगाव येथे झालेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळ्यात या मागणीचा आम्ही पुनर्उच्चार केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्मारकाला भरीव निधी देण्याची घोषणा केली होती. मंत्रिमंडळ बैठकीत 142.60 कोटी स्मारकासाठी व प्रशिक्षण केंद्रासाठी 67.17 लाखांचा निधी मंजूर करून देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला आहे. सातारा जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे सावित्रीबाईंचे स्मारक नायगावात होईल.
- ना. जयकुमार गोरे,
ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य