श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या वतीने ऑगस्ट क्रांतिदिन आणि संस्थेचे मार्गदर्शक आमदार महेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवार, दिनांक 08 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा : शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या वतीने ऑगस्ट क्रांतिदिन आणि संस्थेचे मार्गदर्शक आमदार महेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवार, दिनांक 08 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर (लोकमान्य विद्यामंदिर), माने कॉलनी, एम.आय.डी.सी. सातारा येथील प्रांगणात सकाळी 06:30 ते रात्री 08:30 या वेळेत पार पडणार असल्याची माहिती संस्था सचिव संजीव माने यांनी दिली आहे.
राज्यात सध्या जाणवणारा रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी आणि सामाजिक भान जपण्यासाठी या अतिभव्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी या संस्थेने 1326 बाटल्या रक्त संकलित करून सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या रक्तदान शिबीराचा बहुमान मिळवला होता. या वर्षी 5,000 बाटल्या रक्त संकलित करून पश्चिम महाराष्ट्रात एक नवा इतिहास घडवण्याचा संस्थेचा मानस आहे.
शिबीराच्या यशस्वीतेसाठी ‘एक विद्यार्थी-एक रक्तदाता’ ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबवली जात असून निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धांच्या माध्यमातून घरोघरी जनजागृती केली जात आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील अनेक तरुण मंडळे, आजी-माजी विद्यार्थी संघ आणि आमदार महेशदादा शिंदे मित्र समूह सक्रियपणे सहभागी झाले आहेत.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी आमदार महेशदादा शिंदे, आमदार अरुण लाड, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र समरसता प्रमुख मुकुंदभाऊ आफळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले, सुनील काटकर, संदीपभाऊ शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिबीराच्या ठिकाणी पूर्णवेळ तज्ज्ञ डॉक्टर, आरोग्य, स्वच्छता व सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. सहभागी होणार्या रक्तदात्यांसाठी मोफत अल्पोपहार आणि चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक रक्तदात्याला संस्थेच्या वतीने ’जीवनदान गौरव भेटवस्तू संच’ आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले जाईल. या ऐतिहासिक उपक्रमाला साथ देण्यासाठी नागरिकांनी आणि रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन संस्थेचे सचिव संजीव माने यांनी केले आहे.