विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साखरवाडी-खामगाव येथे आज पहाटे एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक दुर्घटना घडली.
सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साखरवाडी-खामगाव येथे आज पहाटे एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक दुर्घटना घडली. घराबाहेर पडलेल्या विद्युत केबलमध्ये अचानक वीजप्रवाह उतरल्याने विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंब संपल्याने खामगाव परिसरावर आणि संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
ही दुर्दैवी घटना खामगाव येथील एका खाजगी इंग्लिश मीडियम शाळेजवळ पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली. कुटूंबप्रमुख किसन पिसुरड्या शिंदे (वय 48) यांचा वीजप्रवाह उतरलेल्या वायरला नजरचुकीने स्पर्श झाला. त्यांना विजेचा तीव्र झटका बसल्याचे पाहून त्यांची पत्नी गंगुबाई किसन शिंदे (वय 46) या त्यांना वाचवण्यासाठी धावल्या, मात्र त्यांनाही विजेने जखडले. आपल्या आई-वडिलांना वाचवण्यासाठी मुलगा सचिन किसन शिंदे (वय 26) आणि मुलगी आरती किसन शिंदे (वय 22) यांनी पुढे धाव घेतली, परंतु विजेचा प्रवाह इतका जोरदार होता की कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये संपूर्ण कुटुंबाचा जागीच दुर्दैवी अंत झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली आणि महावितरणशी संपर्क साधून परिसराचा वीज पुरवठा खंडित केला. एकाच कुटुंबातील चार जणांचा असा अकाली मृत्यू झाल्याचे पाहून गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. सर्व मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अथवा तांत्रिक बिघाडामुळे केबल तुटून वीजप्रवाह मुख्य वाहिनीतून खाली उतरला होता का, याची चौकशी आता पोलीस आणि महावितरणचे अधिकारी करत आहेत. या दुर्घटनेत महावितरणचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे का, याचाही सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
सर्व चारही मृतदेह (सतीश उर्फ किसन शिंदे, पत्नी गंगू, मुलगा सचिन आणि मुलगी आरती) फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जातील आणि त्यानंतर खामगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
फलटण ग्रामीण पोलिसांनी या दुर्दैवी घटनेची प्राथमिक चौकशी करून अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.