कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
आरक्षण सोडतीत सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी खुला झालेल्या आणि जावली तालुक्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कुसुंबी गणात इच्छुकांची संख्या वाढली आहे.
सातारा : आरक्षण सोडतीत सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी खुला झालेल्या आणि जावली तालुक्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कुसुंबी गणात इच्छुकांची संख्या वाढली आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील बनलेल्या या गणावर आपली कमांड राखण्यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे. या गणात भाजपची मजबूत पकड असून, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाचा आणि करिष्माचा प्रभाव या गणात निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे भाजपकडून जो उमेदवार रिंगणात उतरेल तो विजयी होईल, अशी अटकळ बांधली जात आहे.
या गणात भाजपकडून आपटी (ता.जावळी) येथील सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका लक्ष्मीताई प्रमोद कदम यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. त्या उच्चशिक्षित आहेत. त्यांनी महिला बचत गट संघटन आणि ग्रामीण महिला सक्षमीकरण या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कुसुंबी गणातील बहुतांश गावांमध्ये त्यांनी स्वतःचे सामाजिक नेटवर्क तयार केले आहे. त्यांच्या मागे राजकीय आणि सामाजिक दोन्ही पातळ्यांवर मजबूत पाठबळ आहे. त्यांचे सासरे श्री. विठ्ठल कदम (नाना) हे जावळी दूध संघाचे माजी चेअरमन होते. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यापासून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्व व विकासाभिमुख धोरणांशी सातत्य राखले आहे. अलीकडेच गणात नव्याने समाविष्ट झालेल्या वाकी आणि निपाणी गावांमध्येही लक्ष्मीताई कदम यांच्या सामाजिक कार्याचा ठसा उमटला आहे. त्यांचे सर्वसमावेशक नेतृत्व आणि महिलांमध्ये निर्माण केलेला विश्वास त्यांना प्रबळ उमेदवार म्हणून पुढे आणत आहे.
दरम्यान आरक्षण खुलं झाल्यानंतर येथील इतर इच्छुक कार्यकर्तेही ॲक्टिव्ह झाले आहेत. यामध्ये कुसुंबीचे सरपंच मारुती चिकणे यांनी आपल्या पत्नी प्रिया चिकणे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे करंदीच्या सुरेखा संतोष चव्हाण यादेखील ठाकरे सेनेकडून इच्छुक आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून साधू चिकणे यांच्या पत्नी वैशाली चिकणे तर अमित कदम यांचे समर्थक रवी शेलार यांनी अंधारी-कास गावच्या सरपंच सुरेखा शेलार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे येणारी निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान शरद पवार गट व शिवसेना शिंदे गट कोणाला मैदानात उतरवणार याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
यावेळी स्थानिक पातळीवर इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. मात्र गावपातळीपासून पंचायत समितीपर्यंत विकासाचे मुद्दे, नेतृत्वाची प्रतिमा आणि मतदारांचा कल यावर उमेदवारी ठरणार आहे. आगामी काही दिवसांत उमेदवार घोषणा, प्रचार कार्यक्रम आणि गावपातळीवरील मोर्चेबांधणीमुळे कुसुंबी गणाचे राजकीय तापमान अधिक वाढणार हे निश्चित आहे.
????ज्ञानदेव रांजणे यांचा प्रभाव..
जावळी तालुक्यात जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे हे प्रभावशाली नेते आहेत. त्यांनी कुसुंबी गणातील प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी केली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर काम करत, विकासाचे कोट्यवधींचे प्रकल्प मार्गी लावल्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग इथे आहे. त्यामुळे उमेदवार निवडीत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
????गणातील प्रमुख गावे..
धनकवडी, सायळी, करंदी तर्फ मेढा, निझरे, मालचौंडी, एकीव, दुंद, काळोशी, कुसुंबी, मोळेश्वर, सांगवी तर्फ मेढा, सह्याद्रीनगर, गांजे, पिंपरी तर्फ मेढा, करंजे तर्फ मेढा, केळघर तर्फ सोळशी, तेटली, कोळघर, कसबे बामणोली, आपटी, मांटीमुरा, फुरूस, मोहाट, सावरी, म्हावशी, अंधारी, कास, मौजे शेंबडी, मजरे शेंबडी, फळणी, वाघळी, मुनावळे, उंबरीवाडी, कारगाव, तांबी, मालदेव, वासोटा, वेळे, देऊर, कुसापूर, खिरखंडी, आडोशी, माडोशी, रवंदी.
????गणातील प्रलंबित प्रश्न
* नवीन महाबळेश्वर प्रकल्प मार्गी लावणे
* स्थानिक पातळीवरील रोजगाराचा अभाव
* रस्त्यांच्या समस्या
* तीर्थक्षेत्र कुसुंबीचा विकास
* एकीव धबधबा, कास पठार, मुनावळे, बामणोली आदी पर्यटनस्थळांचा विकास