दिल्लीतील भारत मंडपम येथे इंडिया परिषदेत गोंधळ;
दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया परिषदेदरम्यान’ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सातारा : दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया परिषदेदरम्यान’ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी झाल्याची भावना व्यक्त होत असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) यांच्या युवा सेनेच्या वतीने काँग्रेस नेत्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.
दरम्यान, अमेरिकेसोबत व्यापार करार करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तडजोड केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. “मोदी इज कॉम्प्रोमाइज्ड” अशा घोषणांमुळे देशाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली. त्यांनी सांगितले की, परिषदेला गालबोट लावण्यामागे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानाचा केंद्रबिंदू असल्याचा आरोप आहे.
देशविघातक कृत्यांवर देशवासीयांनी बारकाईने लक्ष ठेवावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या घटनेमुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.