सातारा पालिकेच्या रणांगणातून १० जणांची माघार
सातारा नगरपालिकेच्या रणांगणातून गुरुवारी राजकीय पक्षाचा एक व अपक्ष नऊ अशा एकूण दहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
सातारा : सातारा नगरपालिकेच्या रणांगणातून गुरुवारी राजकीय पक्षाचा एक व अपक्ष नऊ अशा एकूण दहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता शुक्रवारी (दि. २१) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने यानंतरच निवडणुकीची अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
सातारा पालिकेच्या ५० नगरसेवकपदासाठी ३३९ तर नगराध्यक्षपदासाठी १८ उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. मंगळवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत २६७ अर्ज वैध तर ७२ अर्ज अवैध ठरले. नगराध्यक्षपदाचे चार अर्जही छाननीत बाद करण्यात आले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना दि. १९ ते २१ या कालावधीत अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. सातारा पालिकेत बुधवारी चार तर गुरुवारी १० उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला.
प्रभाग एक ब मधून सतीश सूर्यवंशी, २५ ब मधून रेशमा बागवान, प्रभाग १९ अ मधून प्रसन्न अवसरे, प्रभाग ७ अ मधून नंदा इंगवले, प्रभाग १५ अ मधून चंद्रशेखर माहुलकर, प्रभाग २२ ब मधून ओमकार शिंदे, प्रभाग १२ अ मधून विनायक गोसावी, प्रभाग २४ ब मधून शरद कदम, प्रभाग ३ अ मधून सनी भोसले या अपक्ष उमेदवारांसह प्रभाग १ ब मधील रिपाइं आठवले गटाचे नमन तुपे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.