कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जबाबदार वापरासाठी जनजागृती प्रतिज्ञा मोहिम
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून दि. 16 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत भारत मंडपम, नवी दिल्ली येथे इंडीया एआय समिट अँड एक्स्पो 2026 या समिटचे आयोजन करण्यात येत आहे.
सातारा, : भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून दि. 16 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत भारत मंडपम, नवी दिल्ली येथे इंडीया एआय समिट अँड एक्स्पो 2026 या समिटचे आयोजन करण्यात येत आहे. या समिटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा होणारा परिणाम विचारात घेऊन विविध राष्ट्रीय उपक्रम राबविण्यात येत आहेत. इंडीया एआय व इंटेल इंडीया यांच्या संयुक्त विद्यमाने 16 व 17 फेब्रुवारी (निर्धारित 24 तासांच्या कालावधीत) दरम्यान सकाळी 8 पासून देशव्यापी एआय जबाबदारी प्रतिज्ञा मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
जबाबदार, नैतिक व मानवकेंद्रित कृत्रिम बुद्धिमत्ता वापराबाबत जनजागृती करणे व नागरिकांचा व्यापक सहभाग नोंदविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
सर्व वयोगटातील विद्यार्थी, शिक्षक व शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, पालक व संरक्षक, सर्वसामान्य नागरिक, शासकीय अधिकारी व कर्मचारी, विविध उद्योग क्षेत्रातील कर्मचारी व प्रतिनिधी सहभागी होऊ शकतात. सहभागी होण्यासाठी हीींिीं://रळश्रिशवसश.ळपवळररश्र.र्सेीं.ळप/ या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी. प्रतिज्ञा घ्या या पर्यायावर क्लिक करून नोदणी प्रक्रिया सुरू करावी. पूर्ण नाव नमूद करून ई-मेल आयडी किंवा मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी. प्राप्त झालेला ओटीपी नमूद करून प्रमाणीकरण पूर्ण करावे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जबाबदार वापराबाबत काही बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे द्यावीत. डिजिटल प्रतिज्ञा वाचून प्रतिज्ञा पूर्ण या पर्यायावर क्लिक करावे, प्रतिज्ञा पूर्ण झाल्यानंतर डिजिटल बेंज डाउनलोड करता येईल. प्रतिज्ञा पूर्ण केलेल्या सहभागी नागरिकांना इंडीया एआय व इंटेल इंडीया यांच्याकडून मानद डिजिटल प्रदान करण्यात येणार आहे. सहभागी नागरिकांना शासन-प्रेरित विविध एआय शिक्षण उपक्रम सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, ज्यायोगे कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक कौशल्य विकासाला चालना मिळेल.