राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपणारा अजित दादां सारखा नेता हरपला
महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोठे योगदान आहे. पक्ष, विचार वेगळे असले तरी मैत्री जपणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती.
सातारा : महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोठे योगदान आहे. पक्ष, विचार वेगळे असले तरी मैत्री जपणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी राजकीय भेदभाव न करता जिल्ह्यात विकासकामांचा डोंगर उभा केला. त्यांच्यासोबत वित्त राज्यमंत्री म्हणून काम करीत असताना अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. अजितदादा हे उत्तम प्रशासक होते, त्यामुळे आता मंत्रीमंडळात काम करताना त्यांची उणीव कायम जाणवणार आहे. यापुढे सातारा जिल्ह्यात काम करताना अजितदादांच्या कामांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून काम करणार असल्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर रविवारी सातारा येथे त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय आयोजित केलेल्या जिल्हा परिषदेच्या सभागृहातील शोकसभेत ना. देसाई बोलत होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवंेद्रसिंहराजे भोसले, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, खासदार नितीनकाका पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार महेश शिंदे, आमदार सचिन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार दिपक चव्हाण, माजी आमदार सदाशिव सपकाळ, शिवसेना उबाठा गटाचे नितीन बानुगडे - पाटील, आरपीआयचे अशोक गायकवाड, बाळासाहेब सोळस्कर, धैर्यशील कदम, सुनील माने, शिवसेना (शिंदे गट) संपर्क प्रमुख शरद कणसे, रणजीतसिंह भोसले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी ना. देसाई पुढे म्हणाले, राज्याचा वित्तमंत्री कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे अजितदादा पवार. अजितदादा यांनी मंत्रीमंडळात काम करताना अनेक बारकावे जवळून पाहता आले. प्रशासनावर त्यांची चांगली पकड होती. सर्व खात्यांतील कामांचा अनुभव असणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अकाली निधनाने राज्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कामांचा आदर्श घेऊन सर्वांनी काम करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी ना. श्री. छ. शिवंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, स्वर्गीय श्री. छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ना. अजितदादा पवार यांनी मला खऱ्या अर्थाने ताकद दिली. त्यांच्या बहुमोल पाठबळामुळेच मला सातारा परिसरात मोठी विकासकामे करता आली. अजितदादांनी समाजहिताच्या कामांना नेहमीच प्राधान्य दिले. अगदी भाजपमधील पक्ष प्रवेशानंतरही अजितदादांनी पक्षीय भेदभाव न करता साताऱ्याच्या विकासाला झुकते माप दिले. येथील शासकीय विश्रामगृह, मेडीकल कॉलेद, कास धरण उंची प्रश्न तसेच साताऱ्याच्या हद्दवाओढीचा प्रश्न असा एक ना अनेक कामे अजितदादा यांनी सातारा जिल्ह्यात मार्गी लावली. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रासोबत सातारा जिह्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कामांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आता अशी विकासकामे होणे गरजेचे आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अजितदादा पवार यांचा वक्तशीरपणा गुण हा वाखाणण्याजोगाच होता. त्यांच्यासारखा मी ही वक्तशीर राहिलो असतो तर आज काळाबरोबरच दोन पावले पुढे राहिलो असतो. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी अजितदादा पवार यांनी शाहू, फुले, आंबेडकर तसेच यशवंत विचारात कधीही तडजोड केली नाही. अजितदादा यांच्या रुपाने देशातील एक युवा नेता तसेच राज्याच्या नेतृत्त्वाची अपेक्षा असलेले नेतृत्त्व गमावले आहे. मुख्यमंत्री पदाच्या काळात आम्ही समाजहिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री काळात काही कायदे करताना मला त्यांची मोलाची मदत झाली. काही कारणाने आमच्यात मतभेद, गैरसमज झाले त्यानंतर आमच्यात दुरावा वाढला. प्रसंगी मी माघार घेतली असती तर आज महाराष्ट्रात वेगळेच चित्र दिसले असते. ते असते तर भविष्यात राज्यात नक्कीच सत्ताबदल झाला असता, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार महेश शिंदे, आमदार सचिन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार दिपक चव्हाण, माजी आमदार सदाशिव सपकाळ, शिवसेना उबाठा गटाचे नितीन बानुगडे - पाटील, आरपीआयचे अशोक गायकवाड, बाळासाहेब सोळस्कर, धैर्यशील कदम, सुनील माने यांच्यासह विविध मान्यवरांनी यावेळी भावना व्यक्त केल्या.
प्रारंभी खा. नितीनकाका पाटील यांनी शोकसभेचा ठराव मांडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दोन मिनीट स्तबध्द उभे राहून स्ववर्गीय अजितदादा पवार यांना श्रध्दांजली वाहिली. शवेटी पसायदानाने या शोकसभेची सांगता झाली.
उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस अभिवादप्रसंगी ना. शंभूराज देसाई, ना. श्री. छ. शिवंद्रसिंहराजे भोसले, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, खासदार नितीनकाका पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मनोजदादा घोरपडे, महेश शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, दिपक चव्हाण, सदाशिव सपकाळ, नितीन बानुगडे - पाटील व इतर.