वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 9 रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून घेतल्या जाणार आहेत, याबाबतची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे. राज्य निवडणूक समन्वय समितीचे राज्य सदस्य प्राध्यापक सोमनाथ साळुंखे या मुलाखती घेणार आहेत.
सातारा जिल्ह्यात राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातार्यात व्हावे, यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र म्हणून सातारा जिल्ह्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयाचे रंगकर्मींनी स्वागत केले आहे.
केंद्र शासनाने सोयाबीन खरेदीचा हमीभाव ठरवून दिलेला असताना सातारा जिल्ह्यात सोयाबीनचा तेवढा दर मिळत नाही. परिणामी शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. हमीभाव नियमन आणि नियंत्रण याकरिता सातार्यात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे.
सातारा शहरातील 273 कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्याचा दावा सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र तरीही 11 महिन्यांमध्ये निर्बिजीकरणाचे काम समाधानकारक नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी केली होती. त्यानुसार आयोजित बैठकीमध्ये मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी आरोग्य विभागाची चांगलीच कान उघाडणी केली व संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाका, अशी मागणी वाघमारे यांनी करताच त्यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन बापट यांनी दिले.
सातारा जिल्हा शिक्षक सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन किरण यादव यांच्यावर पंधरा संचालकांनी अविश्वास ठराव आणला असल्याची माहिती मिळाली आहे. बँकेच्या नुकत्याच झालेल्या शताब्दी महोत्सवानंतर अचानक घडलेल्या ‘अविश्वास’ व ‘राजीनामा’ घटनांनी जिल्ह्यातील शिक्षक वर्गात खळबळ माजली आहे.
पुणे व सोलापूर या जिल्ह्यांचा साखर उतारा सातारा जिल्ह्यापेक्षा कमी आहे. तरीसुद्धा तेथील शेतकर्यांना साडेतीन हजार रुपये प्रति टन भाव मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने शेतकर्यांना किमान या दराइतका किंवा त्यापेक्षा जास्त चार हजार रुपये टन ऊसाला भाव मिळावा, अशी एक मोठी मागणी शेतकरी संघटनेने सोमवारी केली.
सातारा शहरातील फायनान्स कंपन्यांनी चुकीची वसुली प्रक्रिया राबवली आहे. त्यामुळे माणसांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी करत कोडोली येथील बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालयाला टाळे ठोकले. तत्पूर्वी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत कार्यालयाची तोडफोड केली.
सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांना पिकविम्याचे अद्याप पैसे मिळालेले नाहीत शेतकर्यांच्या प्रश्नाकडे महायुती सरकार केवळ घोषणा करून दुर्लक्ष करत आहे, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावरच बैठक मारली. शिवसैनिकांनी कोरेगाव कडे जाणारा रस्ता रोखून धरल्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
शनिवार पेठेतील चिकनच्या दुकानात झालेल्या जोरदार स्फोटासंदर्भात अजूनही तर्कवितर्क सुरू आहेत. या स्फोटाची तीव्रता भयंकर होती. संबंधित चिकन दुकानाला परवानगी होती का? ती कोणाकडून देण्यात आली होती? या घटनेची वस्तुस्थिती तसेच या प्रकरणातील सामील लोक यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी अशी थेट मागणी पत्रकाद्वारे आम्ही सातारकर या नावाने माची व केसकर पेठेतील नागरिकांनी केली आहे.
नवरात्रोत्सवासाठी शहरात गरबा, दांडिया नृत्याच्या तयारीला वेग आला असून, यासाठी शहरातील अनेक भागांत गरबासाठी प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. या प्रात्यक्षिकांना तरुण-तरुणींचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. घरोघरी होणारी घटस्थापना, तसेच सार्वजनिक मंडळांतर्फे घेण्यात येणार्या विविध उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा गजबजल्या असल्याचे आढळून आले.